मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच, असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहिला. या गीतारहस्य चा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन उच्च शिक्षण सहसंचालक सोनाली रोडे यांनी आज दिले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहण समारंभ स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालिका श्रीमती सोनाली रोडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्या बोलत होत्या. महानगरपालिकेच्या सुरक्षा पथकाने राष्ट्रगीताने सलामी दिली. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानी श्रीमती सोनाली रोडे यांनी पुष्पांजली अर्पण करुन लोकमान्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी लोणची, पापड, मसाल्याचे सुप्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते वसंतराव बेडेकर, मुंबई महाविद्यालयाचे प्राध्यापक रतनकुमार पांडे, श्रीमती समिधा नाहर (उप मुख्याध्यापक , स्कुल ऑफ स्काॅलर्स, अमरावती), श्रीमती सारीका चणेकर (शिक्षिका, विजया काॅन्वेंट, अमरावती), गायक सतीश भिडे, नविन खोडवे, बावा वनकर, लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे कार्यकर्ते व अनेक टिळक भक्त याप्रसंगी उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम यांनी निरजकुमार प्रकाशित गीतारहस्याची हिंदी आवृत्ती श्रीमती सोनाली रोडे यांना भेट दिली. ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा बराचसा इतिहास हा अद्याप लोकांना माहित नाही. भावी पिढीपर्यंत तो इतिहास जाणे गरजेचे आहे’, असे त्या म्हणाल्या. ‘गीतारहस्य तरुणांनी वाचले पाहिजे, तो म्हातारपणी वाचण्याचा ग्रंथ नसून जीवनात कसे वागावे याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे ‘, असे लोकमान्य टिळकांचे म्हणणे होते. म्हणून गीतारहस्याचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा यासाठी आम्ही केलेल्या विनंतीला शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे प्रकाश सिलम यांनी याप्रसंगी निदर्शनास आणले. यावर ‘योग्य ती कारवाई केली जाईल ‘ अशी श्रीमती सोनाली रोडे यांनी सांगितले.
