मुंबई. प्रतिनिधी.१०
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांनी जोर धरला. परंतु,दिल्ली दौऱ्यावर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांची याबाबत कुठेच वाच्यता झाली नसल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं आहे. इतकंच नाही तर सध्या ही भेट टाळता आली असती अशी केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची धारणा असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत काल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांच्या बैठकीमध्ये भाजपा मनसे युतीबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. सदर बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मौन बाळगले आहे.त्यामुळे राज्यातील भाजपा आणि मनसेच्या संभाव्य युतीला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सध्यातरी रेड सिग्नल मिळाला असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबरोबरच भाजपा आणि मनसे युती ही केंद्रीय नेतृत्वाला मान्य नसल्याचे तसेच ही भेट टाळता आली असती, अशीही भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका असल्याचे समोर येत आहे.
