दूध व्यवसाय प्रमुख व्यवसाय निश्चय केल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य उज्वल.- माजी मंत्री.आ. सतेज पाटील.
( मलिग्रेत भावेश्वरी दूध संस्थेचे उद्घाटन, काटकसरीमूळे गोकूळची प्रगती.)
आजरा.- प्रतिनिधी
सत्ता आल्यानंतर काटकसरीचा कारभार केल्याने गोकुळची प्रगती सुरू आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अजून वाढली पाहिजे. त्यामुळे दूध व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून न करता प्रमुख व्यवसाय म्हणून काम केल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री आम. सतेज पाटील यांनी केले.
मलिग्रे ता आजरा येथे श्री भावेश्वरी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे उद्घाटन आम. श्री. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. गोकूळच्या संचालिका अंजना रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या. कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी आजरा कारखाना अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आम. श्री. पाटील बोलताना म्हणाले दुधामुळे जिल्ह्याची आर्थिक उन्नती झाली. गोकुळ आणि जिल्हा बँक टिकल्या पाहिजे. ह्या जिल्ह्याच्या हृदय आहेत. आम्ही या दोन संस्था आई वडीलासारख्या जोपासत आहोत. आम्ही सत्तेत आल्यानंतर १५०० कोटी रूपये वाढवले. ८ लाखाचे १८ लाख लिटर संकलन झाले. एक रूपयातील ८६ पैसे शेतकऱ्यांना देतो.१४ पैशात प्रशासकीय व्यवहार केले. ७० लाख रुपये वीज बिलाची बचत केली.

श्रीमती रेडेकर म्हणाल्या, पाडव्याला २१ लाख लिटर संकलन झाले. गोकुळ प्रगतीपथावर असून दूध संस्थांनी नवीन उत्पादक शेतकरी तयार करावेत.व्यावसाय म्हणून दूध धंदा तरूणांनी करावा.यावेळी माजी सरपंच दत्ता परीट, काँ. संजय तर्डेकर, रामराजे कुपेकर यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी जि प चे माजी अध्यक्ष उमेश आपटे, माजी सभापती मसणू सुतार, विद्याधर गुरबे, दिग्विजय कुराडे, रमेश रेडेकर, संजय सावंत, विकास बागडी, रामदास पाटील आदी उपस्थित होते. संजय घाटगे यांनी आभार मानले.