🛑जळगावमध्ये धावत्या पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवाशांनी मारल्या उड्या – ( दुसऱ्या कर्नाटक एक्स्प्रेस ट्रेनखाली चिरडून ११ जणांचा मृत्यू.- ट्रेनला आग लागल्याची अफवा ठरली कारण..)
🟥भारताने पहिल्याच टी २० सामन्यात इंग्लंडला चारली धुळ.- मिळवला दमदार विजय.
जळगाव :- प्रतिनिधी.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ पुष्पक ट्रेनला रेल्वेला ब्रेक मारल्यानंतर आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी 30 ते 35 प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उड्या मारल्या मात्र समोरून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने या प्रवाशांना चिरडलं. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हा अपघात प्रवाशांमध्ये निर्माण झालेल्या आगीच्या भीतीमुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
🛑जळगावमध्ये एक भयंकर घटना घडली. आगीच्या भीतीनं प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. त्यामुळे शेजारील ट्रॅकवर समोरुन बंगळुरु एक्सप्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं अनेकांना उडवलं असून या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात आज दुपारी घडला. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसने परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अचानक ब्रेक लावला. यामुळे एक्स्प्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे भयभीत झालेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण त्याचवेळी समोरून येणाऱ्या नवी दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
🟥भारताने पहिल्याच टी २० सामन्यात इंग्लंडला चारली धुळ.- मिळवला दमदार विजय
कोलकात्ता :- वृत्तसंस्था.
भारताने पहिल्याच टी २० सामन्यात इंग्लंडला धुळ चारली. भारताच्या अभिषेक शर्माने यावेळी तुफानी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पण त्यापूर्वी भारताचा विजय सोपा केला तो गोलंदाजांनी. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी मोलाच्या विकेट्स मिळवल्या. त्यामुळे भारताला इंग्लंडच्या संघाला १३२ धावांवर ऑल आऊट करता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. पण अभिषेकने फलंदाजीत सातत्य दाखवले आणि भारताचा सात विकेट्स राखून विजय सुकर केला. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अभिषेक शर्माने यावेळी वादळी फलंदाजी करताना ३४ चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ७९ धावांची धावांची दमदार खेळी साकारली.
इंग्लंडच्या १३३ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने संघाला वादळी सुरुवात करून दिली. संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. संजूला मोठी खेळी साकारता आला नाही. संजूने यावेळी २० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २६ धावा केल्या. संजू बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो सूर्यकुमार यादव. सूर्याकडून यावेळी भारताला मोठ्या आशा होत्या. पण सूर्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. भारताला एकामागून एक दोन धक्के बसले होते. पण त्यानंतर अभिषेक शर्माने संघाला सावरले.
अभिषेक शर्माने यावेळी तिलक वर्माच्या साथीने दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली. अभिषेकने यावेळी २५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण धावांचे आव्हान कमी असल्यामुळे त्याचे शतक होणार नाही, याचा अंदाज सर्वांना होता. पण तरीही अभिषेकने आपल्या फलंदाजीची धार कमी केली नाही. अभिषेकने अर्धशतकानंतरही धडाकेबाज फटकेबाजी सुरुच ठेवली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकली आणि सूर्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. सूर्याचा हा निर्णय किती योग्य आहे हे अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात दाखवून दिले. अर्शदीपने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला, पण अर्शदीप फक्त यावर थांबला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातही त्याने इंग्लंडला अजून एक धक्का दिला. त्यामुळे इंग्लंडची २ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर कर्णधार जोस बटलरने अर्धशतक झळकावले आणि त्यामुळे इंग्लंडला शतकाच वेस ओलांडता आली. जोसने यावेळी ४४ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे इंग्लंडला १३२ धावा तरी करता आल्या. भारताकडून यावेळी वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी मिळवले. पण अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत वरुणला चांगली साथ दिल्याचे पाहायला मिळाले.
