सोमवारी आजऱ्यात महाविकास आघाडीचा मोर्चा….
एव्हीम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी…
आजरा – प्रतिनिधी.
माझं मत मी कोणाला दिलं आहे. हे काळण्याचा प्रत्येक भारतीयाला अधिकार असून एव्हीममुळे आपले मत कुठं गेलं आहे हेच कळत नाही. किंवा दिलेले मत एव्हीएमशी छेडछाड करून बदलले जाऊ शकते असे आता प्रत्येक नागरिकाला वाटत असल्याने इथूनपुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आजरा येथे मोर्चाचे आयोजित करण्याचा निर्णय आज जनता बँकेच्या सभागृहात झालेल्या माजी आमदार के पी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थनी मुकुंददादा देसाई होते.
यावेळी बोलताना के पी पाटील म्हणाले की पराभवाने खचून जाणारा मी कार्यकर्ता नाही. या निवडणुकीत जनतेने भरभरून मते आपल्याला दिली आपला पराभव हा केवळ तांत्रिक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वारे असताना सत्ताधार्यांना मिळालेले बहुमत अनाकलनीय आहे. हा तांत्रिक पराभव असून आपण पुन्हा सगळे नेटाने कामाला लागूया. आता सर्वानाच रस्त्यावरची लढाई करावी लागणार आहे. हे सरकार विरोधकांना चिरडू पाहणारे आहे त्यामुळे आपण सर्वजण एकसंघपणे या शक्तीच्या विरोधात उभे राहूया असे आवाहन त्यांनी केले.
सुरवातीला कॉ संपत देसाई प्रास्ताविक करताना म्हणाले की आपण या निवडणुकीत झालेल्या पराभवाची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. त्यासाठीच ही बैठक असून पराभवाची चिकित्सा करून त्यातील चुका टाळून नव्याने दमदार सुरवात करावी लागेल. जनतेच्या प्रश्नावर आपण एकत्रितपणे रस्त्यावर उतरुया असेही ते म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलताना मुकुंदादा देसाई म्हणाले की या निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता येणाऱ्या सर्व निवडणुका एकसंघपणे लढूया. कार्यकर्त्यानी आता मरगळ झटकून टाकून आपण कामाला लागूया. येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणूका लढून जिंकूया.
सुनील शिंत्रे म्हणाले की आता कोणावर आरोप करत बसण्यापेक्षा आपण एकसंघपणे राहून लढूया. नाहीतर आपलं भविष्य अवघड आहे. यावेळी सुधीर देसाई, उमेश आपटे, उदय पवार, राजू होलम, समीर चांद, नौशाद बुड्डेखान, प्रकाश मोरुस्कर, शांताराम पाटील, जोतिबा चाळके यांनीही आपली मते मांडली. यावेळी विश्वनाथ कुंभार, संभाजी पाटील, रवींद्र भाटले, रणजित देसाई, गोविंद पाटील, नारायण भडांगे, निसार लाडजी, सुभाष दोरुगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार युवराज पवार यांनी मांनले.
चौकट
मोर्चा सकाळी ठीक ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून निघेल, मोर्चा संभाजी चौकात आल्यानंतर तिथं रस्ता रोखू होऊन मोर्चाचे सभेत रूपांतर होईल.