Homeकोंकण - ठाणेमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी कोकणवासीयांचा जन आक्रोश! राज्य सरकारला दिला हा इशारा!!🟥अहमदाबाद...

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी कोकणवासीयांचा जन आक्रोश! राज्य सरकारला दिला हा इशारा!!🟥अहमदाबाद – मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे इंजिनपासून निखळले🟥समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची जोरदार धडक.- बाप-लेकाचा जागीच मृत्यू

🟥मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी कोकणवासीयांचा जन आक्रोश! राज्य सरकारला दिला हा इशारा!!
🟥अहमदाबाद – मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे इंजिनपासून निखळले
🟥समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची जोरदार धडक.- बाप-लेकाचा जागीच मृत्यू

वाशिम :- प्रतिनिधी.

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाशिममध्ये महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये ३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर सकाळी ११.४५ वाजता भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे चालकाने महामार्गावर कडेला ट्रक उभा केला होता. याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २१८ वर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले.

🟥अपघातामध्ये ४५ वर्षीय वडील आणि ७ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले असून यामध्ये २ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघातग्रस्त कार नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती. अपघातामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा पुढील भाग कापून त्यानंतर मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

🟥अहमदाबाद – मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे इंजिनपासून निखळले

सुरत :- वृत्तसंस्था.

गुजरातमधील सुरतजवळ आज अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे दोन डबे वेगळे झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेने (डब्ल्यूआर) जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिली. जेव्हा ट्रेन (क्रमांक १२९३२) सायन आणि सुरत रेल्वे स्थानकांदरम्यान गोथंगम यार्डमध्ये पोहोचली होती. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाहीत. वेगळे झालेले डबे नंतर पुन्हा ट्रेनमध्ये जोडले गेले.

🟥पश्चिम रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितले की, घटनेनंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर लूप लाइनवरून अप गाड्या चालवण्यात आल्या. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, या मार्गावरील इतर गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. पश्चिम रेल्वेने नंतर जाहीर केले की दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या घटनेनंतर तातडीने रेल्वे कर्मचारी आणि रेल्वेचे आधिकारी तसेच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर ही ट्रेन दुरुस्त करण्यात आली. मात्र, दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ शेकडो प्रवाशांचे हाल झाले. अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या या डबल डेकर एक्सप्रेसचं कपलिंग तुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, कपलिंग तुटल्यानंतर पुन्हा वेगळे झालेले डब्बे जोडण्यात आले. यानंतर एक्सप्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना करण्यात आली.

🟥मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी कोकणवासीयांचा जन आक्रोश! राज्य सरकारला दिला हा इशारा!!

रायगड – प्रतिनिधी

चौदा वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून आधी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराच राज्य सरकारला कोकणवासियांनी दिला आहे. पनवेल आणि अलिबाग येथेही महामार्गाच्या कामासाठी आंदोलने करण्यात आली.

🟥मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेला सरकारची निष्क्रियताच जबाबदार असल्याचा आरोप करत जनआक्रोश समितीने आजपासून आंदोलन सुरू केले आहे. माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
🅾️हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही, अपघातात जखमी झालेल्यांना सहाय्य केले जात नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावरती अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने करून द्यावी, यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे
.

🔴संजय यादवराव, रुपेश दर्गे, अजय यादव, संजय जंगम,पराग लाड, सुरेंद्र पवार, प्रशिल लाड, आशिष बने, अनिल जोशी यांनी या आंदोलनाची हाक दिली असून त्यास मावळ प्रतिष्ठान, बजरंगदलसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, उद्योजक शेखर गोडबोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला.

🟥नवीन महामार्ग होऊ देणार नाही.- यादवराव

गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणवासियांचे प्रमुख सण आहेत. या सणाला कोकणी माणूस यायला निघाला की सरकार सल्ला देते पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जा, अरे आम्ही आमच्या हक्काच्या रस्त्याने जायचे नाही तर किती वर्षे दुसर्‍यांच्या दारातून घरी जायचे हे यापुढे जमणार नाही, आधी आमचा रस्ता पूर्ण करा. जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणासाठी घोषणा होत असलेल्यापैकी एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला.
🟣आम आदमी पक्षाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. अजय उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. महामार्गाचे काम तातडीने मार्गी लावा अन्यथा कोकणवासीयांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर खड्डे अ‍ॅक्टिव्हिस्ट दिलीप जोग यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या पनवेल येथील कार्यालयासमोर आंदोलन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.