पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.- आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
मुंबई. प्रतिनिधी.१८ जून.
एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. मात्र आता विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखला म्हणजे TC (transfer certificate ) /LC (leaving certificate) शिवाय प्रवेश दिला जाणार आहे. नुकतंच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय जारी केला आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मतारखेचा दाखल्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना काळात अनेक पालकांना विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरता आलेले नाही.त्यामुळे अनेक शाळा विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नाकारत आहेत. शाळेचा दाखला नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होते. तसेच त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते.
निर्णयात नेमकं काय?
RTE’च्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा हक्क असतो. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोणत्याही शासकीय, महापालिका, नगरपालिका किंवा खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत इयत्ता 9 वी किंवा दहावी वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना T.C (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असा निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच पूर्वीच्या शाळेतून ट्रान्सफर सर्टिफिकेट प्राप्त न झाल्यात संबंधित शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला वयानुसार वर्गात प्रवेश दिला जावा. यासाठी जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. यामुळे कोणताही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडीत होऊन तो शाळाबाह्य होणार नाही, असेही यात नमूद करण्यात आलं आहे.
