Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रटोल हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.- विराट मोर्चाद्वारे टोलला विरोध.‌( आजरा तालुक्याचा...

टोल हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.- विराट मोर्चाद्वारे टोलला विरोध.‌( आजरा तालुक्याचा एकच निर्धार टोल हद्दपार…)

टोल हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.- विराट मोर्चाद्वारे टोलला विरोध.‌
( आजरा तालुक्याचा एकच निर्धार टोल हद्दपार…)

आजरा :- प्रतिनिधी.

Oplus_131074

संकेश्वर-बांदा महामार्गासाठी आजरा एमआयडीसी येथे उभारलेल्या टोल नाक्यावर आजरा तालुक्यातील जनतेला टोलमुक्ती मिळावी यासह टोल हद्दपार झाला पाहिजे, अशी मागणी टोलविरोधी संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चाद्वारे आजरा तालुक्यातील नागरिकांनी केली. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीने केले. टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या आजरा बंदलाही व्यापारी असोसिएशन यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
टोलविरोधी आंदोलन मोर्चाला आजरा आंबोली रोडवरील हॉटेल मिनर्वा येथून सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी टोलविरोधाच्या घातलेल्या टोप्या लक्षवेधी ठरल्या. आजरा तालुक्यातील जनतेला टोल माफी मिळालीच पाहिजे, टोल रद्द झाला पाहिजे यासह विविध घोषणा देत विराट मोर्चाने नागरिक टोल नाक्यावर येऊन धडकले. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. टोल मुक्ती आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना कॉ. संपत देसाई म्हणाले, राष्ट्रीय महामार्गामुळे प्रवास सुखकर होईल, याकरता सर्वांनी महामार्गाच्या कामाला सहकार्य केले. मात्र टोलचे बेकायदेशीर भूत आमच्या मानगुटीवर लादले गेले आहे. पण आम्हाला टोल माफी नाही टोल मुक्तीच हवी आहे. राज्यमार्गाच्या कामाला ठेकेदार मिळत नसल्याने हा रस्ता महामार्गाकडे वर्ग करण्यात आला. पण या रस्त्याची बांधणी ही बांधा वापरा हस्तांतर करा या तत्त्वावर झालेली नसून याकरता महामार्गाने निधी लावला आहे. रस्ता चार पदरी किंवा सहा पदरी झालेला नसून फक्त रस्त्याची रुंदीकरण व मजबुतीकरण झाले आहे. महामार्ग चार पदरी नसताना टोल वसुलीचा घाट का घातला जात आहे? महामार्गाच्या कामाचे पैसे राज्य शासनाने केंद्र शासनाला देऊन रस्ता टोलमुक्त करावा. या रस्त्याच्या टोलबाबत दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. हा रस्ता तयार करत असताना महामार्गाचे निकष पाळले गेलेले नाहीत. त्यामुळे अपघातांची मालिका होणार आहे. या टोलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव हाणून पाडायचा आहे. आता केवळ इशारा मोर्चा काढला आहे. टोल रद्दबाबत तातडीने निर्णय न झाल्यास यापेक्षाही मोठं आंदोलन केले जाईल. जनतेला संपूर्ण टोल माफी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशाराही कॉ. देसाई यांनी दिला.

Oplus_0

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संपर्क साधत सांगितले की, टोल प्रश्न तालुक्यातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन टोल मुक्ती बाबत धोरण ठरवण्यात येईल. टोल मुक्तीच्या आंदोलनात आपण जनतेबरोबर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Oplus_0

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पर्यटकांना टोल बसवण्याच्या नादात आजरा तालुकावासियाना आर्थिक फटका बसणार आहे. संकेश्वर बांदा रस्त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसताना हा रस्ता महामार्ग कसा होऊ शकतो? टोलला हद्दपार करण्यासाठी जन आंदोलन, राजकीय लढाई व कायदेशीर लढाई या तिन्ही बाबींचा अवलंब करावा लागेल. या महामार्गावरचा टोल हटवला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत आजरेकर नागरिक टोल देणार नाहीत. वेळ पडली तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. टोल हटवल्याशिवाय आता कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही. आंदोलन एवढे तीव्र करू की टोलला हद्दपार करू आणि टोलमुक्तीचा आजरा पॅटर्न देशभर नेऊया असे श्री आम. आबिटकर म्हणाले

Oplus_0

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग व आजऱ्याजवळचा टोल याला आमचा विरोध आहे. या कामांना स्थगिती नको तर ती रद्द झालं पाहिजे. सरकारने आमच्या मागण्यांच्या कडे लक्ष दिले नाही तर आगामी काळात संघर्ष अटळ आहे. असे श्री पाटील म्हणाले .जिल्हा बँक संचालक ए. वाय. पाटील म्हणाले, संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्तीच्या लढ्यात आंदोलकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, नवीन तयार करण्यात आलेल्या रस्त्याला कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. टोलच्या रूपाने तालुक्यावर अन्याय होत आहे. अॅड. शैलेश देशपांडे म्हणाले, महामार्गाचे काम घाईत करण्यात आले आहे. एक रुपयाही न देता या महामार्गावरून प्रवास करणे हा तालुक्यातील जनतेचा हक्क आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे म्हणाले, आता जर टोल लागला तर तो आयुष्यभरासाठी लागणार आहे त्यामुळे संघर्ष हा करावाच लागेल.
यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, माजी. जि.प. अध्यक्ष उमेश आपटे, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, तानाजी देसाई, उल्हास त्रिरत्ने यांनी मनोगत व्यक्त केली. टोलमुक्ती आंदोलनाला आजरा तालुक्यातील व्यापारी संघटना, बार असोसिएशन संघटना, डॉ. संघटना, सरपंच संघटना, आजरा साखर कारखाना कामगार, तोडणी ओढणी वाहतूकदार व इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा साखर कारखान्याचे उदयराज पवार, डॉ. अनिल देशपांडे, सुधीर कुंभार, अनिकेत कोळेकर, माजी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर. संजय सावंत, नामदेव नार्वेकर, रवींद्र भाटले, दशरथ अमृते, रचना होलम, एम. के. देसाई, अभिषेक शिंपी, संग्राम सावंत, जी. एम. पाटील, रशीद पठाण, मनसेचे आनंदा घंटे, सुधीर सुपल, सरिता सावंत, तेजस्विनी देसाई यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. संजय पाटील यांनी आभार मानले.

Oplus_0

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.