भाजपच्या नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं सांगून फडणवीस व चंद्रकांतदादा आमदारांना थोपवत आहेत.- खडसे
मुंबई. प्रतिनिधी.०७.
महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगत आहेत. सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी लगावला. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा खडसे यांनी काढला.
