गोव्यात मडगाव – मुंबई ‘वंदे भारत’एक्स्प्रेस रेल्वे 29 पासून सुरु होणार.- रेल्वे विभागाची माहिती.
मुंबई.- प्रतिनिधी.
चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते.आता ही रेल्वे 29 मेपासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली. या रेल्वेचा शुभारंभ मडगावहून होईल व पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील, अशीही माहिती मिळाली.
या रेल्वेची चाचणी मंगळवार, 16 मे रोजी झाली होती व मुंबईहून न थांबता आलेल्या या रेल्वेला मडगावमध्ये पोहोचायला केवळ सात तास लागले होते. सध्या या रेल्वेचा थांबा कुठल्या कुठल्या रेल्वे स्थानकांवर करावा त्याचे वेळापत्रक करण्याचे काम सुरू आहे.ही गाडी काही ठराविक रेल्वे स्थानकांवर थांबेल. त्यामुळे जास्तीत जास्त 8 तासांत ही एक्स्प्रेस अंतर कापेल. त्यामुळे प्रवाशांचे चार तास वाचतील. या एक्स्प्रेसची ताशी 180 किमी वेगाने धावण्याची क्षमता आहे. मुंबईहून यापुर्वी तीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुटत आहेत. त्या मुंबई-गांधीनगर, मुंबई-शिर्डी व मुंबई-सोलापूर अशा आहेत. मुंबईहून सुटणारी ही चौैथी वंदे एक्स्प्रेस आहे.
रेल्वे भारतीय बनावटीची
ही रेल्वे भारतीय बनावटीची असून ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत विकसित केली आहे. चाचणीदरम्यान रेल्वेच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, एसॲण्डटी सुवरवायझर या सर्वांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या व त्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या.
