मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात. –
तिहेरी अपघातात रिक्षा आणि क्रूझरचा चक्काचूर.- तर तिघांचा मृत्यू.
धुळे :- प्रतिनिधी.

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर 9 जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
धुळे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक, अॅपे रिक्षा आणि क्रूझर गाड्या एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा आणि क्रूझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.तिन्ही गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर चक्क क्रेनच्या सहाय्याने या गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. धुळे तालुका पोलिसांनी रात्री मदतकार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.अपघातातील जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झालेल्या गाड्या महामार्गावरुन हटवण्यात आल्या आणि त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मुंबई-गोवा महामार्गावरही अपघात मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खवटी गावानजीक भीषण अपघात झाला आहे.चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला क्वालिस गाडीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात क्वालिस गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे तर गाडीतील सात प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातले असून ते संगमेश्वरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. अपघातातील सर्व जखमींवर खेड मधील कलंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
