⭕महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन ?;
⭕उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट……
मुंबई प्रतिनिधी
राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून ठाकरे सरकारची चिंता वाढू लागली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद झाली.
२४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला.
यामुळे राज्याला पुन्हा एकदा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागतो का काय ?
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
ते नंदुबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे.
सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत.
पुन्हा लॉकडाउन करणं एक मार्ग आहे.
लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे.
मात्र मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
लोक आता मास्क वापरु लागले आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते.
मात्र आता जो पसरतो तो नवा विषाणू आहे का ?
याबाबत माहिती अद्याप तरी दिलेली नाही”.
रुग्णवाढीचा कळस गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचा कहर सुरू आहे.
गेल्या तीन- चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असून एका दिवसात सर्वाधिक बाधितांची उच्चांकी नोंद गुरुवारी झाली.
चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली.
सध्या राज्यात आठ लाख १३ हजार २११ व्यक्ती गृह अलगीकरणात असून ७०९७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७९ टक्क्यांवर गेले आहे.
