कणकवली –
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात लक्ष देणार असून राज्यातही भाजपची सत्ता आणणार, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारची लायकी फक्त पोस्टर्स लावण्यापुरती आहे. आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, “लगान’ची टीम नको असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
जिल्हा बॅंक निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅंक निवडणुकीत माझ्या विरोधात महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र आले. पण मी त्यांनी पुरुन उरलो. जिल्हा बॅंक निवडणुकीनंतर आता राज्याकडे लक्ष असून राज्यात भाजपची सत्ता आणणार, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा बॅंक निवडणूकीत विरोधकांनी कायद्याचा, पोलीस यंत्रणेचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न केला. निलेश राणेंच्या जामीन अर्जावर चार-चार दिवस चर्चा होते. 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं काही पाहिले नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बॅंक दिली आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना खोचक टोला लगावला.
राजन तेली यांचा राजीनामा
या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा मात्र पराभव झाला आहे. त्यामुळे “गड आला, पण सिंह गेला’ अशी भाजपची स्थिती झाली आहे. या निकालामुळे राजन तेली नाराज झाले आहेत. त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यांनी आपला फोन स्विच ऑफ केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
