शेतीपिकांच्या नुकसानीबाबत 2 हजार 192 कोटी असे एकूण 4 हजार 489 कोटी रुपये निधी वितरित. शासनाचा मोठा निर्णय.
मुंबई – सह्याद्री न्यूज मराठी.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच शेतजमीन, मनुष्यहानी, पशुधनहानी, मत्स्यव्यवसायाचे नुकसान, घर पडझड सानुग्रह अनुदान यासाठी 9 नोव्हेंबर 2020 च्या शासन निर्णयाद्वारे 2 हजार 297 कोटी तर 7 जानेवारी 2021 च्या शासन निर्णयान्वये शेतीपिकांच्या नुकसानीबाबत 2 हजार 192 कोटी असे एकूण 4 हजार 489 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.
निधी वाटपाचे काम सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषदेत दिली. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सदस्य रणजीतसिंह मोहिते – पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यासाठी दोन हप्त्यात 545 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधी वाटपाचे काम सुरू असून उर्वरित लाभार्थींना लवकरच निधी देण्यात येईल, अशी माहितीही राज्यमंत्री तनपुरे यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ.परिणय फुके व प्रशांत परिचारक यांनी सहभाग घेतला.