जालगाव, आनंदनगर, बर्वे आळी, केलस्कर नाका, बुरोंडी भागाला अतिवृष्टीने पडला होता पुराचा वेढा
रत्नागिरी :प्रतिनिधी.
-दापोली पोलीस स्थानक परिसरातील जालगाव, आनंदनगर, बर्वे आळी, केलस्कर नाका आणि बुरोंडी या भागात ६ आणि ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे अनेकजण पुराच्या वेढ्यात अडकले होते. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी पोलीस अधिकारी नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली तत्काळ पूरग्रस्तांसाठी बचाव मोहीम राबविण्यात आली. पुरात अडकलेल्या सर्वाँना सुरक्षित ठिकाणी आणून त्यांचे प्राण वाचविले.
या बचाव कार्यात पोलिस उपनिरीक्षक निनाद कांबळे, पोलीस हवालदार गायकवाड, सातार्डेकर, गुजर, पोलीस नाईक जाधव, पोलीस शिपाई मोरे, बोरकर, पटेकर, ग्रामसेवक साळवी, अजय करमरकर, देवेंद्र शिंदे, तलाठी अंबेरे, तसेच स्थानिक प्रसाद फाटक, विकास लिंगावले, मुश्ताक मिरकर, रफिक बुरोंडकर, प्रमोद पावसे, गुलाम मुजावर यांचा सहभाग होता. त्यांनी तत्काळ बचाव कार्य करून उल्लेखनीय कामगिरी केली.
याकामी पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांचे मार्गदर्शन लाभले. पोलिस अधीक्षक. डॉ. श्री. गर्ग यांनी बचाव कार्य करणाऱ्या पथकाचे आणि स्थानिक नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
