एन सी एम सी स्मार्ट कार्ड सक्ती पुर्णपणे बंद करा.
( आजरा तहसीलदार यांना निवेदन.)
आजरा.- प्रतिनिधी.
शासनाच्या वतीने जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व महीला ना पुर्वी प्रमाणे एस टी सवलत कायम स्वरुपी चालू ठेवणे बाबत आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस, प्रवासामध्ये जेष्ठ नागरिक महिला व विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार प्रवास भाड्यात सवलत दिली जाते, पूर्वीप्रमाणे संबंधित पात्र प्रवाशांनी आधार कार्ड अथवा वैद्य पास ओळखपत्र दाखवल्यास सवलतीचा लाभ मिळत होता ही पद्धत सोपी पारदर्शक व प्रवासांच्या दृष्टीने सोयीची होती. आता मात्र सवलतीचा लाभ घेण्यासाठी एन सी एम सी स्मार्ट कार्ड काढणे व त्यामध्ये रिचार्ज करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे यामध्ये ग्रामीण भागातील प्रवाशांचे फार हाल होत आहेत. सवलत मिळण्यासाठी स्वतंत्र स्मार्ट कार्ड काढण्याची सक्ती करणे ही मूळ सवलतीच्या उद्देशालाच बाधा आणणारी बाब आहे, विशेषतः जेष्ठ नागरिक ग्रामीण भागातील प्रवासी आणि विद्यार्थी यांना नवीन पद्धतीमुळे अनावश्यक त्रास व आर्थिक भार सहन करावा लागत आहे. यासाठी आम्ही गिरणी कामगार संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एनसीएमसी कार्ड ची सक्ती कायम स्वरुपी बंद करण्यात यावी. पूर्वीप्रमाणे पात्र प्रवाशांना आधार कार्ड दाखवून वैद्य पास ओळखपत्र दाखवून आवश्यक असलेल्या संबंधित पात्रतेचा पुरावा दाखवून थेट बस मध्ये सवलतीची तिकीट देण्याची पद्धत कायम ठेवण्यात यावी. एन सी एम सी कार्ड सर्व्हर डाऊन, नेटवर्क बंद किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे सवलत मध्ये जेष्ठ नागरिक विद्यार्थी व महिलांना गैरसोयचे होत असल्याने वाहकांना मानसिक त्रासाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे. यासाठी स्मार्ट कार्ड सक्ती पूर्णपणे रद्द करून पुर्वी प्रमाणे सवलत कायम ठेवण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. यांची नोंद शासन पातळीवर कळविणेत यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी काँ. शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, नारायण भडांगे, महादेव होडगे,निवृत्ती मिसाळे , मनपा बोलके, नंदा वाकर, सत्यवती शेटगे, विठ्ठल बामणे, प्रकाश निकम, कृष्णा सुतार, निवृत्ती कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक गिरणी कामगार व माकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.




