स्मार्ट मीटरसह वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांवर महावितरणकडून कार्यवाहीचे आश्वासन.- शिवसेना आजरा वतीने आंदोलनाने केलेल्या मागणीला महावितरण कडून लेखी उत्तर.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे आजरा तालुक्याच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी महावितरणकडे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनातील मागण्यांवर महावितरणकडून लेखी उत्तर देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांची संमती घ्यावी, जुन्या मीटरमध्ये दोष नसताना ते बदलू नयेत, जादा व चुकीची वीजबिले तपासून दुरुस्त करावीत, तसेच शेतीपंपाच्या वीजबिलाबाबतच्या तक्रारींची तपासणी करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या होत्या.
महावितरणने स्पष्ट केले की, स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही शासनाच्या प्रचलित धोरणानुसार केली जात असून कोणत्याही ग्राहकास स्मार्ट मीटरबाबत तक्रार असल्यास त्याची स्वतंत्रपणे पडताळणी करून नियमानुसार कार्यवाही केली जाईल. जादा बिलांच्या तक्रारींची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचेही सांगण्यात आले आहे.
शेतीपंपाच्या बिलातील तफावत, जुन्या मीटरऐवजी नवीन स्मार्ट मीटर बसविणे, तसेच शेतातील विद्युत वाहिनी शॉर्टसर्किटमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबतही महावितरणने नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. धोकेदायक वीजखांब बदलण्याबाबतही प्राप्त अर्जांची छाननी करून प्राधान्याने कार्यवाही केली जाईल, असे महावितरण यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद आहे.
