गजरगावच्या सरपंचांना ठरविले अपात्र – १५ दिवसात अपील करता येणार
आजरा | प्रतिनिधी .
गजरगाव (ता. आजरा) येथील सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरणी विद्यमान सरपंच आनंदा रानकु कांबळे यांना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या न्यायालयाने दिला आहे. गजरगाव येथील सरकारी गायरान जमीन रि.स.नं. १३६/३/१, गट नं. १२८ मध्ये अतिक्रमण करून घर बांधून राहत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ (१) (ज-३) अन्वये जिल्हाधिकारी न्यायालयात प्रकरण दाखल झाले होते.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान संबंधित कागदपत्रे, युक्तिवाद व उपलब्ध पुराव्यांचा विचार करण्यात आला. सरकारी रस्त्यावर/गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट होत असल्याने संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी हा आदेश पारित केला. आदेश मान्य नसल्यास संबंधितांना पुणे विभागीय आयुक्तांकडे १५ दिवसांच्या आत अपील करता येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
