आजरा येथे रविवारी किसान सभेचा ‘संघर्ष व लढा मेळावा’
आजरा .- प्रतिनिधी :
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, बेघर तसेच देवस्थान व मठ ट्रस्टच्या जमिनींसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आजरा येथील श्रमिक पतसंस्था, जिजामाता कॉलनी येथे ‘संघर्ष व लढा मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात देवस्थान व मठ ट्रस्ट जमीन प्रश्न, शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न, गावठाण वाढ तसेच पुढील आंदोलनाची दिशा यावर चर्चा होणार आहे. तसेच कोल्हापूर येथे दि. ६, ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेच्या २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ॲड. दशरथ दळवी राहणार असून कॉ. संग्राम सावंत, कॉ. शिवाजी गुरव, शिवाजी गिलबिले व कॉ. शांताराम पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शेतकरी व ग्रामीण जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभा आजरा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.




