कुत्र्यांनंतर आता बकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.
आजरा | प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील चांदेवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या बिबट्याने शेतकरी अमर भुजंग हसबे यांच्या बकऱ्यांवर हल्ला करून बकरे लंपास केल्याची घटना घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, अद्याप लंपास झालेली बकरे अथवा बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आलेले नाहीत. पावसाअभावी ठसे स्पष्ट न मिळाल्याने वन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वी परिसरातील पाळीव कुत्री लंपास करणारा बिबट्या आता बकऱ्यांकडे वळल्याने ग्रामस्थांमध्ये भीती वाढली आहे. पाळीव प्राण्यांनंतर बिबट्याची धाव मनुष्यवस्तीकडे व मनुष्यांवर होऊ नये, यासाठी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
