सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
( ‘२०१७ व २०१९ च्या कर्जमाफीत वंचित शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर योजनेत समाविष्ट करा’.)
मुंबई. – प्रतिनिधी.
भाजपा नेते व माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
पत्रातील महत्वाचे मुद्दे:
- विषय :-
सन 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व सन 2019 मधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून न्याय द्यावा. - समस्या काय?:
चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक शेतकरी या दोन्ही योजनांमध्ये पात्र ठरले होते. परंतु निधी उपलब्धता, तांत्रिक त्रुटी, आधार संलग्नीकरणातील समस्या, बँकांच्या प्रशासकीय विलंबामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
- परिणाम: शासनाच्या निर्णयावर विश्वास ठेवून कर्ज परतफेडीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर आज मोठा आर्थिक भार निर्माण झाला आहे. व्याज, दंडामुळे कर्जाची रक्कम वाढली आहे. अनेकांना बँकांकडून “थकबाकीदार” म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
- मुनगंटीवारांची मागणी : –
- वरील दोन्ही योजनांमध्ये पात्र परंतु विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची विशेष पडताळणी करावी.
- त्यांना तातडीने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून लाभ मंजूर करावा.
- विलंबामुळे वाढले व्याज, दंड व इतर आकारणी शासनाच्या जबाबदारीवर माफ करावी.
- तसेच, “महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या प्रकरणाचा संवेदनशीलतेने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा.” असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
