पुढील पाच-सहा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता.-
भारतीय हवामान अंदाज.
मुंबईः- प्रतिनिधी.
मान्सून दाखल होऊन देखील जून महिना कोरडा गेला. पण जुलैच्या पहिल्या ६ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने जून महिन्यातील पावसाची कमतरता भरून काढली. पण या पावसानंतर आता मान्सूनने विश्रांती घेतली. पाऊस गायब झाला असून आता पुन्हा उकडा सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मान्सून कमकुवत का झाला यामागचं कारण हवामान खात्याने दिले आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या पश्चिम प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या एका शक्तिशाली वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सून कमकूवत झाला असून पावसाचे प्रमाण देखील घटले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाने विश्रांती घेतली. घाटमाथ्यावर ५०० मिलिमीटर वरून पाऊस थेट शून्यावर आला आहे. पुढील पाच-सहा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. गेल्या आठवडाभर पुणे शहर, घाटमाथा आणि कोकणात मुसळधार बरसलेल्या पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी ५०० ते ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत या भागातील बहुतांश भागांत पावसाची नोंद थेट शून्यावर आली आहे. पावसाची ही परिस्थिती अनपेक्षित नसून विविध हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाचा जोर कमी झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उघडीप झाल्यामुळे राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. राज्यातील कमाल तापमान ३५ अंशावर पोहचले असल्यामुळे उकाडा वाढला आहे.
पाऊस गायब झाल्यामुळे राज्यात पावसाची उघडीप, उन्हाचे चटके वाढले आहेत आणि उकडा देखील प्रचंड वाढला आहे. हे हवामान पुढील काही दिवस असेच राहण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी ऊन-ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, व्यापक स्वरूपाचा पाऊस नसल्याने उकाडा आणि दमटपणा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातही उन्हाळ्यासारख्या वातावरणाचा सामना करावा लागत आहे.



