“आर्थिक आरोप करणाऱ्यांनी स्वतःला तपासावे” – आजऱ्यातील डाव्या आघाडीचा शिंदे शिवसेनेला टोला ( टोलविरोधी संघर्षावरून राजकारण तापले; सर्वपक्षीय बैठक लावण्याची मागणी.)
आजरा, प्रतिनिधी:
“डाव्या आघाडीची नीतिमत्ता प्रगतिशील आणि निष्कलंक आहे. दुसऱ्यांवर आर्थिक आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःला तपासावे,” असा टोला डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना लगावला. टोलविरोधी संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेऊन टोलाबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. त्यापूर्वी आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून टोलनाका स्थलांतराची मागणी केली होती. यावर टोलविरोधी कृती समितीच्या काही सदस्यांनी पत्रकार परिषदेत मंत्री आबिटकर यांनी सर्वपक्षीय बैठक लावून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली होती.
या मागणीवर शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी आज, दि. २६ रोजी डाव्या विचारांच्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.
कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, “गेली अनेक वर्षे आम्ही डाव्या आघाडीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रश्नांवर जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभाराविरोधात आंदोलनाच्या माध्यमातून लढा देतो. आम्ही भूमिका कधीही बदलली नाही, चळवळ सोडली नाही. नाम. प्रकाश आबिटकर यांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे, डाव्या विचारांचे होते. त्यांना डावी आघाडी व चळवळ काय असते हे माहिती आहे. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बालिश आरोप करणे चुकीचे आहे. आरोप करताना आपण कोणावर करतो याचा विचार करावा. कार्यकर्त्यांच्या जडणघडणीसाठी अभ्यास शिबिरांची गरज आहे.”
“टोलचा लढा सर्वपक्षीय होता. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. टोलमुक्ती व टोल सवलत या प्रमुख मागण्या होत्या. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन बैठक लावावी म्हटल्यावर राग येण्याचे कारण काय? कोणतेही आर्थिक व्यवहार न पाहता आरोप कसे करता?” असा सवाल देसाई यांनी केला.
कॉ. शांताराम पाटील म्हणाले, “आजरा तालुक्याला टोलमाफी मिळावी यासाठी आरोप-प्रत्यारोप न करता सर्वांनी एकत्र काम करावे. चुकीची वक्तव्ये करून टीका करू नये. प्रत्यक्ष लढ्यात सहभागी व्हावे. पालकमंत्री नाम. आबिटकर यांनी गिरणी कामगारांसाठी चांगले काम केले आहे. जनतेच्या विविध प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा द्यावा.”
प्रकाश मोरस्कर म्हणाले, “टोलमाफीसाठी खासदार व पालकमंत्र्यांनी काम करावे. टोल आंदोलनात सहभागी नसलेल्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत. तुमच्यातील काहींचे काळे धंदे असतील तर चौकशी करावी लागेल. ज्यांच्यावर आर्थिक आरोप करायचे आहेत, त्यांची नावे घेऊन बोला. टोलविरोधी संघर्ष समिती सर्वपक्षीय विचारांची आघाडी होती.”
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, “पालकमंत्र्यांनी नेतृत्व करून टोलप्रश्नाची बैठक लावावी व प्रश्न मार्गी लावावा असे म्हटल्यानंतर वाईट वाटण्याचे कारण काय? आरोप करताना विचार करावा.”
यावेळी भीमराव माधव, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, प्रकाश कालेकर, शंकर पाटील, व्हि. डी. जाधव, मारुती पाटील, दशरथ घुरे, युवराज जाधव यांच्यासह डाव्या आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काशिनाथ मोरे यांनी आभार मानले.
