रत्नागिरी. प्रतिनिधी. २७ .
युवासेना सचिव वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला. ते रत्नागिरीत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत बोलत होते. नारायण राणेंच्या अटक नाट्याच्या तिसऱ्या दिवशी भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघाली. आज राणे रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात जाऊन या यात्रेचा समारोप करणार आहेत.
दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला. वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं होतं.
त्याबाबत नारायण राणे म्हणाले, “आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेव्हढी त्याला आहे. त्याने मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या मुलांनी एव्हढा चोपला ना.. आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच”, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. आपल्या पक्षाला खासदार आणि विधानसभेत राज्य येण्यासाठी आमदार पाठवणं गरजेच आहे, शिवसेना औषधालाही उरली नाही पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.
