🛑मान्सूनचा प्रवास ३० मे नंतर थंडवणार.- मात्र राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार.- हवामान विभागाचा अंदाज
मुंबई :- प्रतिनिधी
यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, सर्वसाधारण स्थितीमध्ये मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा तब्बल 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजीच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मान्सूननं महाराष्ट्राच्या काही भाग व्यापला आहे. केरळमध्ये देखील यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊ सुरू आहे. दरम्यान आता मान्सूनसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे.सुरू असलेला पाऊस उद्या पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र 30 मे नंतर राज्यातील मान्सूनचा प्रवास थंडवणार आहे, त्यामुळे मान्सूननं संपूर्ण विदर्भ व्यापायला 15 जूनपर्यंत वाट पहावी लागू शकते अशी माहिती नागपूर वेधशाळेचे ज्येष्ठ वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
30 मे नंतर पावसाचा प्रवास थंडावणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 100 मिली मीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं हवामान विभागानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात धडाक्यात आगमन झालेल्या मान्सूनचा प्रवास 30 मे नंतर काहीसा थंडवणार आहे, त्यामुळे संपूर्ण विदर्भ व्यापण्यासाठी 15 जूनपर्यंत वाट पाहावी लागण्याचा अंदाज आहे.
यंदा देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. यंदा 108 टक्क्यांच्या आसपास पावसाचं प्रमाण राहू शकतं असं हवामान विभागानं म्हटलं आहे. देशाच्या दक्षिण आणि मध्य भागांमध्ये यंदा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे, आज सकाळी पावसानं थोडीशी उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पावसानं हजेरली लावली आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.