जंगल समृद्धीकरणाचा प्रस्ताव बनविण्यासाठी बैठक घेण्याच्या वनविभागला सूचना… जिल्हाधिकारी व आ सतेज पाटील यांच्यासह झालेल्या बैठकीत निर्णय…( आजरा, चंदगड, भुदरगडसाठी पथदर्शी प्रकल्प कॉ. संपत देसाई यांची माहिती.)
आजरा – प्रतिनिधी.
आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यात वन्यप्राणी आणि शेतकरी संघर्ष संपविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी, पर्यावरणातील तज्ञ आणि चळवळीचे कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक पंधरा दिवसाच्या आत बोलवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कोल्हापूर वनविभागाला दिले. आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील वनहक्काचे दावे आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिल्याची माहिती कॉ. संपत देसाई यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की जंगली प्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष कायमचा संपवायचा असेल तर जगले समृध्द केली पाहिजेत. यासाठी आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यात जंगल समृद्धीकरणाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी काय करता येईल याबत जिल्हाधिकारी यांनी यावर तातडीने बैठक बोलवण्यासाज निर्देश दिल्याने गेली दहा वर्षे चळवळीने घेतलेल्या भूमिकेला आणि केलेल्या संघर्षाला आता मूर्त स्वरूप येण्याची शक्यता तयार झाली आहे.
आजरा चंदगड, भुदरगडसह जिल्ह्यातील सात तालुक्यातील धनगर तसेच वननिवासी कुटुंबाचे वन हक्काचे दावे तातडीने तपासण्याच्या सूचना त्यांनी सर्व प्रांताना दिल्या आहेत.
तालुक्यातील हरपवडे, चितळे आणि आवंडी धनगर वाड्यावरील दावे तपासून जिल्हासमितीला पाठवण्याच्या सूचना त्यानी प्रांताना दिल्या.
बैठकीला विजय देवणे, राहुल देसाई, कॉ.सम्राट मोरे, अविनाश भाले, राजेंद्र कांबळे, प्रकाश मोरुस्कर, बयाजी येडगे, जानू कोकरे, कृष्णा भारतीय यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.