’आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज दि.१० ते १४ एप्रिल पर्यंत तब्बल पाच दिवस राहणार बंद!
कुणाल कामरा प्रकरण!- हायकोर्टाने बजावली मुंबई पोलिसासह आमदारांना नोटीस!!
मुंबई – प्रतिनिधी
विविध सरकारी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा असलेले ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज तब्बल पाच दिवस बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवरून प्रदान केल्या जातात. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी हे पोर्टल विकसित केले आहे. मात्र दिनांक १० ते १४ एप्रिल असे पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहील असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
‘आपले सरकार’ हे महाराष्ट्र शासनाचे एक वेब पोर्टल आहे, जे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे, नागरिक विविध सरकारी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि त्यांची माहिती मिळवू शकतात. नागरिकांना सरकारी सेवा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे हा या मागचा उद्देश आहे.
या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यतनासाठी पुढचे पाच ते हे पोर्टल बंद करण्यात येणार आहे. या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत.
राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी. या कालावधीत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कुणाल कामरा प्रकरण!- हायकोर्टाने बजावली मुंबई पोलिसासह आमदारांना नोटीस!!
मुंबई – प्रतिनिधी
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. या प्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी कामराने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली हाेती. या प्रकरणी न्यायालयाने आज (दि.८) मुंबई पोलिस आणि गुन्हा दाखल केलेल्या शिवसेना आमदाराला ‘उत्तर द्या’ नोटीस बाजवली असून, पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
न्यायालयाचे ‘उत्तर द्या’ निर्देश, १६ एप्रिलला होणार सुनावणी
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकमनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला होता. यारून राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामराविरोधात गुन्हा दाखल झाला हाेता. कामराने न्यायालयाकडे गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि एस.एम. मोडक यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. पोलिस आणि तक्रारदार आमदार पटेल यांना सूचना घेऊन याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या प्रकरणात पुढील सुनावणी आता बुधवार १६ एप्रिल २०२५ रोजी होणार असल्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे.
शिवसेना आमदाराने दाखल केला कामराविरोधी FIR
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यावरून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामराविराेधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. कामरा याला अनेक वेळा चौकशीसाठी समन्स देखील बजावले होते. त्याने चौकशीसाठी हजर राहणे टाळले. यानंतर त्याने दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर बुधवार १६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कामराचे २०२१ पासून तामिळनाडूमध्ये वास्तव्य
तीन समन्स बजावल्यानंतरही पोलिसांसमोर हजर न झालेल्या या कॉमेडियन कुणाल कामरा याने ५ एप्रिल रोजी एफआयआर रद्द करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. कामरा यांचे वकील, ज्येष्ठ वकील नवरोज सेर्वाई यांनी न्यायालयाला माहिती दिली की, कॉमेडियन कामराने त्यांच्या जीवाला आणि सुरक्षिततेला धोका असल्याचे कारण देत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. कामरा त्यांच्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे २०२१ पासून तामिळनाडूमध्ये राहत आहे.
कामराच्या याचिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अधिक भर
कामराच्या याचिकेत नमूद केलेल्या युक्तिवादात म्हटले आहे की, त्याचे विधान राजकीय घटनांवर, विशेषतः शिवसेनेतील फूट आणि २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या संदर्भात केले गेले होते. त्यामुळे त्याच्याविरोधीत दाखल केलेला एफआयआर (FIR) हा त्याच्या मूलभूत अधिकारांचे विशेषतः भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे आणि जीवन आणि स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. कामराच्या कायदेशीर टीमने “हा गंभीर गुन्हा नाही, तर विनोदी सादरीकरणातून उद्भवलेला गुन्हा आहे. त्यामुळे कामरावर चौकशी सुरू ठेवणे हे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन ठरेल, जे स्वातंत्र्य भारतीय संविधानानुसार संरक्षित आहे, असेही म्हटलं आहे.