रिक्षा चालकाने कोपरखैरणे, नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने तीन लाखांचे दागिने मालकाला दिले परत
नवी मुंबई.- प्रतिनिधी : दशरथ कांबळे
गावावरून आलेल्या प्रवाशाची तीन लाखांचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरलेल्या महिलेला, एका प्रामाणिक रिक्षा चालकाने कोपरखैरणे पोलिसांच्या मदतीने परत देण्यात आली आहे. रिक्षा चालकाच्या या प्रामाणिकपणामुळे कोपरखैरणे पोलिसांनी त्याचा सत्कार केला आहे. तर त्या प्रवाशाने कोपरखैरणे पोलिसांचे व रिक्षा चालकाचे आभार मानले आहेत.
सकाळच्या सुमारास प्रियांका पार्टे या त्यांच्या परिवारासोबत गावावरून आल्या होत्या. गुलाब सन्स डेरी पासून ते सेक्टर 6 येथे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा केली होती. रिक्षातून उतरल्यावर दागिने असलेली बॅग त्या रिक्षात विसरल्या. घरी आल्यावर दागिन्यांची बॅग रिक्षात विसरले माहिती होताच पार्टे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला.

पोलिसांनी वेगाने तपास करून रिक्षा चालकाशी संपर्क साधून रिक्षा चालकाला पोलिस ठाण्यात बोलावले असता, प्रामाणिक रिक्षा चालक अभिषेक बरदाडे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हजर राहून हरवलेली बँक जशीच्या तशी पोलिसांना सुपूर्द केली. बॅग मिळाल्यावर पोलिसांनी मूळ मालकाला पोलीस ठाण्यात बोलून हरवलेला मुद्देमाल परत केला, व रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून, कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रिक्षाचालक अभिषेक बरदाडे याला शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं. याबाबत प्रियांका पार्टे यांनी रिक्षाचालक व कोपरखैरणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

