राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल.- तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय. नाहीत नेते शरद पवार
बारामती. प्रतिनिधी. २७.
काही मुद्द्यांवर एकत्र येत राज्यातील महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. सरकार चालवताना काही प्रश्न उपस्थित होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. पवार आज (रविवारी) बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय:-
काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. यावर शरद पवार बोलताना म्हणाले की, राज्यातील तीनही पक्षांची सरकारमधील भूमिका हा एक भाग आहे. तर राजकीय पक्ष म्हणून संघटनेचं काम वाढवणं ही दुसरी बाजू आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे. हा प्रयत्न करण्यासंदर्भात आमच्या सर्व पक्षांचं सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत. तसेच तिन्ही पक्षात मतभेद होऊ नये म्हणून चर्चा झाली. त्यानुसार अजित पवार, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे समन्वय साधण्याचे काम करत आहेत. कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेतात, असे पवार यांनी स्पष्ट केले.
आरबीआयचा निर्णय धोरणात्मक असेल तर स्वीकारावाच लागेल:-
आरबीआयने नवीन आदेश दिले असून यापुढे लोकप्रतिनिधींना सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळणार नाही, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, आरबीआय ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागेल, असेही मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
