सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली.- महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, प्रतिनिधी. २२ जून :-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा आरोप केला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी समन्वय समितीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
👉राज्याच्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही वाद नाहीत. कोणताही असमन्वय नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. तिन्ही पक्षांमध्ये कोणीही नाराज नाही, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असंही शिंदे म्हणाले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
