पावसामुळे मुंबई तुंबली.- सकल भागात पाणीच पाणी
पुढील तीन चार तास जोरदार पावसाचा इशारा
मुबई :- प्रतिनिधी.
खूप दिवसांपासून लांबलेला पाऊस सुरू झाला आणि पावसाने मुंबईसह राज्याच्या इतर शहरांमध्ये दमदार बॅटिंग सुरू केली आहे. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे शहरातील काही ठिकाणी पाणी भरले आहे. हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवार जोरदार पावसाचा इशारा दिल होता. गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. तसेच पुढील तीन-चार तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे तज्ञ के. एस . होळकर यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईत मुसळधार पावसाळा सुरवात झाली असून मुंबई महापालिकेच्या नागरिकांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगर मध्ये मध्य स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेने भरती-ओहोटीची माहिती आणि वेळदिली आहे. महानगरपालिकेने ही माहिती ट्विट करत दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ठाणे आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस होत आहे. ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस होत असून सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वंदना सिनेमा आणि चरई या ठिकाणी दोन फुटांपर्यंत पाणी भरले आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चलकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. भिवंडीमध्ये सुद्धा जोरदार पावसामुळे शहरातील तीनबत्ती, भाजीमार्केट, बाजारपेठ परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी भरले आहे. तर आजूबाजूच्या अनेक दुकानात पाणी शिरले आहे. या प्रकारामुळे करोडो रुपये खर्च करून महापलिकेने केलेल्या नालेसफाई फोल ठरली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
