अखेर राज्यात मान्सूनची सलामी, पुढचे ५ दिवस धो-धो बरसणार; कुठल्या शहरात, जिल्ह्यात अलर्ट? वाचा तर सविस्तर माहिती.👇
मुंबई : – प्रतिनिधी.
राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं अखेर आता पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. कोकणात रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला असून काल पावसानं विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. तर आज पुण्यातही मान्सून जोरदार बरसला. अशात पुढचे ५ दिवस हे महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी यासंबंधित ट्वीट करून माहिती दिली आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आणि कधी पाऊस पडणारे यासंबंधीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या ३ आठवड्यापासून राज्यात उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. अशात शुक्रवारी रात्रीपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मान्सूनने हजेरी लावली. तर आज सकाळपासून मुंबई, पुण्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्याचं पाहायला मिळालं.हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पुढच्या ५ दिवसांत मान्सून सक्रिय होईल तर येत्या ५ दिवसांमध्ये जोरदार पाऊस बसेल अशी माहिती आहे. के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. दरम्यान, मराठवाड्यातही पावसाचा जोर पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या ३-४ दिवसांत विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अशा परिस्थितीत विदर्भातील जनतेला उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
