गत ऊस हंगामातील ऊस दराचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा.
( स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजरा साखर कारखान्याला निवेदन.)
आजरा : – प्रतिनिधी.
आजरा साखर कारखान्याने गत ऊस हंगामातील ऊस दराचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. गत हंगामात उसाला चांगला दर मिळाला असला तरी वाढलेली मजुरी, ऊस तोडणी व वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे गतवर्षी तुटलेल्या उसासाठी प्रतिटन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
हा हप्ता जमा न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या साखर व उपपदार्थांची विक्री रोखण्याबाबत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पांडुरंग सावंत, तानाजी देसाई, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील, निवृत्ती कांबळे, नरेंद्र कुलकर्णी, भिकाजी पाडेकर, मारुती पाटील, धोंडिबा सावंत, भीमगोंड पाटील, परसराम आपगे, राणोजी कुंभार यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.




