🔴अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण स्फोट;
तालिबान सरकारच्या मंत्र्यासह १२ जण ठार;
🟣आत्मघाती हल्ल्याचा संशय
काबूल :- वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भीषण स्फोट झाला आहे. ज्यामध्ये तालिबानचे निर्वासित मंत्री खलील रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. आज बुधवारी काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या कंपाऊंडमध्ये हा स्फोट झाला. राजधानी काबूलमध्ये मंत्रालयाच्या आवारात स्फोट झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आत्मघाती हल्ला मानला जात आहे. रिपोर्ट्सनुसार या स्फोटात हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास असणारे अनेक लोक जखमी झाले आहेत.
🟪आतापर्यंतच्या तपासात जे समोर आले आहे, त्यानुसार हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आत्मघाती हल्लेखोर मंत्रालयात कसा पोहोचला? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. खलील रहमान हक्कानी हे तालिबान सरकारमध्ये निर्वासित आणि स्थलांतर मंत्री होते. त्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान सत्तेवर परतल्यानंतर कार्यवाहकच्या आधारावर ही जबाबदारी देण्यात आली होती. तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे ते काका होते.
🟣अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतात जन्मलेले हक्कानी हे पश्तूनांच्या जदरान जमातीचे होते. अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. दरम्यान, ते गेल्या अनेक वर्षांपासून तालिबानसोबत काम करत होते. त्याआधी हक्कानी यांचा काहीकाळ अल-कायदा संघटनेशीही संबंध होता. २००२ मध्ये हक्कानी यांना पक्तिया प्रांतात अल-कायदा संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
🅾️खलील रहमान हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका आणि हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख व्यक्ती होते. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर 7 सप्टेंबर 2021 रोजी निर्वासितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरु आहे. त्यामुळे हा हल्ला इसिसकडून केला गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण या प्रकरणात कोणत्याही संघटनेने अद्याप जबाबदारी स्वीकारलेली नाही. इस्लामिक स्टेटने वारंवार असे हल्ले केले आहेत, ज्यामुळे अलीकडील काही महिन्यांत तालिबान सरकारसोबत त्यांचा तणाव वाढला आहे.
सरकार स्थापन झालं पण खातेवाटपासाठी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी? 🔴खातेवाटपाचं घोडं कुठे अडलंय? चर्चा सुरु
मुंबई. – प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होऊन आता ७ दिवस होत आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अजूनही सापडत नाही. प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीच्या खातेवाटपाचं घोडं नेमकं कुठे अडलंय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीवारीवर आहेत. त्यामुळे या दिल्लीवारीतून नेमकं काय हाती लागणार याबाबत उत्सुकता आहे.
🔴उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. महायुती सरकारचा शपथविधी होऊन आठवडा होत आला पण अजून महायुतीचं खातेवाटप झालेलं नाही. अशातच आता हिवाळी अधिवेशन चार दिवसांवर आलंय. अजूनही खातेवाटप नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तसेच विरोधकांकडून महायुतीवर टीका देखील होत आहे.
🟥दिल्लीवारीला निघालेल्या एकनाथ शिंदेंची प्रकृती ठिक नसल्यांनं त्यांनी दिल्लीला जाणं टाळलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पोहचलेत. खातेवाटपासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याला दांडी मारल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपकडे 137 आमदारांचं संख्याबळ असल्यानं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची राजकीय कोंडी झाल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय. दिल्लीच्या हायकमांडवरच भरवश्यावर राहावे लागेल. त्यांचा पत्ता सुद्धा हलणार नाही. म्हणजे फांदी हलवायचं सोडाच पान देखील हलणार नाही. ऐवढी कोंडी या निकालाने या दोन्ही पक्षाची केली आहे. अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
🅾️तर महायुतीचे सगळे निर्णय आता दिल्लीत होऊ लागलेत. महायुतीचे अंतिम नेते आता अमित शाहा झाल्याची कोपरखळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारली. महायुती सरकाचा शपथविधी होऊन सात दिवस झाले आहेत. तर देखील अद्याप खातेवाटप झालेले नाहीये. जवळपास आठवडाभरापासून हे खातेवाटप झालेले नाहीये. त्यामुळे विरोधक देखील आता अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला गेल्याने खातेवाटपासंदर्भात चर्चा सुरु झालीये. आता या दिल्ली दौऱ्यात खातेवाटपाचा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा आहे.