आंबे ओहोळ धरणग्रस्तांचे आंदोलन तिसऱ्या दिवशी, प्रशासनाकडून दुर्लक्ष.- ( पुनर्वसन जमिनीवर बेकायदेशीर बोजाचा आरोप.)
आजरा – प्रतिनिधी.
आंबे ओहोळ धरणग्रस्त शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. प्रशासनाकडून अद्याप दखल न घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, विविध संघटना प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन शासनाचा निषेध नोंदवत प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा जाहीर केला आहे.
६५% बोजाचा मुद्दा काय?
प्रकल्पग्रस्तांच्या वतीने शिवाजी गुरव यांनी व्यथा मांडली. ते म्हणाले, “सध्या सुरू असलेले आंदोलन पुनर्वसनात मिळालेल्या जमिनीवर बेकायदेशीर बोजा चढवल्यामुळे आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, ॲडिशनल कलेक्टर श्री.पवार व अन्य अधिकाऱ्यांनी जे जमीन वाटप आदेश काढले, त्यात शेतकऱ्याकडून रक्कम येणे आहे, असा कॉलम कधीच नव्हता. कारण प्रकल्पग्रस्ताची संपादित जमिनीच्या मोबदल्यातील ६५ टक्के रक्कम शासनाकडे जमा केल्यानेच मिळालेल्या जमिनीवर बोजा चढवण्याचा प्रश्नच येत नव्हता.”
२०१७ मध्ये चुकीचा कॉलम – गुरव यांचा आरोप.-
“मात्र २०१७ साली तत्कालीन प्रांताधिकारी यांनी चुकीचा शेवटचा कॉलम राखून मिळालेल्या जमिनीच्या किमतीच्या ६५ टक्के रक्कम त्यात नोंदवली. महाराष्ट्रात इतरत्र कुठेही असा बोजा सांगणारा कॉलम नाही. शासन निर्णयानुसार वर्ग दोन ची जमीन विनाअट वर्ग एक करण्यात आली आहे. याची खातरजमा अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे, पण ते करायला तयार नाहीत,” असे गुरव यांनी स्पष्ट केले.
संवादास अधिकारी तयार नाहीत.
“आम्ही अजूनही प्रशासनाला वेळ देण्यास तयार आहोत. पण तहसीलदार किंवा प्रांताधिकारी संवाद साधायला तयार नाहीत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे,” असा आरोपही गुरव यांनी केला.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे धरणग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, जोपर्यंत जमिनीवरील बेकायदेशीर बोजा हटवला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. असे आंदोलकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
चौकट.
आंबे ओहोळ धरणग्रस्तांचे चालू असलेल्या आंदोलनासंदर्भात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांनी कॉ.शिवाजी गुरव यांच्याकडून घेतली माहिती उद्या पुनर्वसनमंत्र्यांच्या सोबत होणार चर्चा आंबे ओहोळ धरणग्रस्तांचे राहिलेले पुनर्वसन याबाबत सविस्तर चर्चा शिवाजी गुरव आणि मेधाताई पाटकर यांच्यामध्ये फोनवरून झाली पुनर्वसना संदर्भात इतर धरणांच्या सोबत आंबे ओहोळची ही चर्चा उद्याच होणार आहे.
